पाकच्या सीमा बंदिस्त करण्याच्या निर्णयावर टीका केल्यानंतर आता चीनने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. भारत -पाक यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करु, असे चीन सरकारने म्हटल्याचे वृत्त मंगळवारी एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलने दिले आहे.
भारत -पाक यांच्यातील कटुता कमी करण्यासाठी चीनतर्फे संपूर्णपणे सहकार्य केले जाईल, असे चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे चीन-आशियासाठीचे वाणिज्यदूत युआन यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियात सध्या सत्तेचा असमतोल निर्माण झाला आहे. भारत -पाक यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाचा केवळ त्या देशांवरच परिणाम होत नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाई भागाला याचे चटके सहन करावे लागत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
2018 पर्यंत भारत -पाक यांच्यातील सीमा पूर्णत: बंदिस्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी केली आहे. याची चीनी माध्यमांनी दखल घेत अत्यंत तर्कहीन निर्णय अशा शब्दात या निर्णयाचे वर्णन केले आहे. चीनच्या मदतीने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरीडोर उभारण्यात येत असून हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मिरमधून जात आहे.
अलिकडेच पाकव्याप्त काश्मिरमध्येच भारताने सर्जिकल ऑपरेशन केल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकल्पावर काळे ढग गोळा झाले आहेत.