शहरासह जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी आता पोलीस प्रशासनाने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तळेगाव येथील बालिकेवरील अत्याचारानंतर उसळलेल्या हिंसाचारावर पोलीस प्रशासनाने दोन दिवसांत नियंत्रण आणले असले तरी ग्रामीण भागातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील आठ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून नाशिकमध्ये पोलिसांनी संचलन करून नागरिकांना आश्वस्त केले.
त्र्यंबकरोड व सिन्नर फाटा येथे बुधवारी दोन बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळे शहर बससेवेबरोबरच नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी तालुका तसेच नाशिक-मुंबई बससेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. तर इंटरनेट सेवा आणखी तीन दिवस बंद राहणार आहे.