कचर्यापासून खतनिर्मिती करणारा खत प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महापौर अशोक मुर्तडक आणि स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांना दिले. यासंदर्भात नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या पदाधिकार्यांनी राज ठाकरे यांची शुक्रवारी (दि.7) मुंबईत भेट घेऊन मागणी केली. खत प्रकल्पामुळे निर्माण होणार्या प्रदूषणामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प पडला आहे. यामुळे शहराची आर्थिक उलाढालही बंद झाल्याची बाबही क्रेडाईने ठाकरे यांच्या कानी घातली.
कचरा डेपोची देखभाल योग्य प्रकारे न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नाशिक शहरात बांधकाम करताना पर्यावरणविषयक जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक अॅड. राहुल ढिकले तसेच क्रेडाईचे मानद सचिव उमेश वानखेडे, कार्यकारिणी सदस्य रवि महाजन, सुनील गवांदे, अनिल आहेर, शंतनू देशपांडे, सचिन बागड आदी उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेची आहे. ती योग्य प्रकारे सुरू झाल्यानंतरही एनजीटीकडून सहा महिने पाहणी करून खात्री झाल्यावरच त्या अटीतून मुक्ती मिळणार आहे. शहरातील आर्थिक उलाढाल आणि विकास सुरू राहावा यासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे मनपाने कचर्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प त्वरित सुरू करावा, असे आदेश देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
एनजीटीच्या अटींमुळे बांधकामांना पूर्णत्वाचे दाखले मिळणे अशक्य झाले आहे. महापालिकेकडे अशा प्रकारची सुमारे तीन हजार प्रकरणे आज प्रलंबित आहेत. त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित सर्वच छोट्या-मोठ्या व्यावसायिक, मजूर, वित्तसंस्था, ग्राहक यांना बसला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मंदीसदृश स्थिती निर्माण झाल्याची माहिती कोतवाल यांनी ठाकरे यांना सांगितली.