उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायची की नाही यावर बरीच चर्चा सुरू असताना अजय देवगणनं सांगितलंय की तणाव निवळेपर्यंत तो पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही.काम एका मुलाखतीत अजय देवगण म्हणाला की सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणं योग्य नाही. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या 19 जवानांच्या कुटुंबांची भावना आपण समजून घ्यायला हवी. त्यांना कसं वाटत असेल याचा विचार आपण करायला हवा, असंही मतही त्यानं व्यक्त केलं आहे.
अजय म्हणाला, काहींना वाटेल की मी इंडस्ट्रीच्या विरोधात बोलतोय. पण असं काही नाहीय. फिल्म इंडस्ट्रीत अशी काही माणसं आहेत, जे ही गोष्ट समजत नाहीयत. आणि काही जण समजून घ्यायला तयार नाहीत. काही जण यावर भूमिका घेतायत, तर काही जण भूमिका घेतच नाहीयत.
बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अजय देवगण म्हणाला की, हे मान्य की पैसा महत्त्वाचा असतो. पण किती? एका मर्यादेनंतर पैसा महत्त्वाचा की देश हे ठरवावं लागतंच.
एकीकडे सलमान खान, करण जोहर, राधिका आपटे यांसारखे कलाकार पाकिस्तानी कलाकारांचे गोडवे गात असताना, अजय देवगणनं घेतलेली ही भूमिका महत्त्वाची ठरते.
