सत्तेवर असताना जे नेते आपल्या जातीचे काही भले करीत नाहीत त्यांना सत्ता गेल्यावर जातीची आठवण येते. केवळ सत्तेसाठी त्यांना जातीचा पाठिंबा हवा असतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर टीका केली.
आरक्षण व इतर मागण्यांसाठी सध्या राज्यभर मराठा समाजाचे विशाल मोर्चे निघत आहेत. या मोर्चांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. तसेच अनेक नेत्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे हे वक्तव्य आले आहे.
भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले, भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणतीही सामाजिक व आर्थिक विषमता नसलेला देश उभा करायचा आहे; जिथे कोणावरही आरक्षण मागायची वेळ येणार नाही.