‘सर्जिकल’वरून पॉलिटिकल स्ट्राईक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर करावेत, अशी मागणी करून आम आदमी पार्टी व काँग्रेस देशभरात संभ्रम निर्माण करू पाहत आहे, अशी टीका भाजपकडून मंगळवारी करण्यात आली. जवानांच्या बहादुुरीबद्दल शंका घेण्याचा ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल व काँग्रेसी नेते चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचेही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल ऑपरेशनचे पुरावे सादर करावेत, असे विधान दिल्‍लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले होते. माझे आणि पंतप्रधानांचे मतभेद असू शकतात; पण पाकिस्तानच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून त्याबद्दल मी त्यांना सलाम करतो, असेही केजरीवाल यांनी  म्हटले होते.

काँगे्रसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम, दिग्विजय सिंग यांनीदेखील सर्जिकल ऑपरेशनचे पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.

भारताने दहशतवादाच्या विरोधात कडक पावले उचलली, देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्जिकल कारवाईची आवश्यकता होती. देशाचा सन्मानाला ठेच पोहोचेल असे कोणतही कृत्य केले नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

पाकव्याप्त भागात घुसून भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याबाबत कुणीही शंका उपस्थित करू नयेत. भारतीय जवानांच्या शौर्याविषयी शंका उपस्थित करू नका, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईकवर असे विधान करणे हे राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवण्यासारखे आहे. आपले राजकारणीच बेछुट वक्तव्य करुन पाकिस्तानचे हात बळकट करत असल्याची टीका सेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *