न्यायमुर्ती लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिल्यानंतर बीसीसीआयने सध्या सुरू असलेली भारत – न्युझिलंड मालिका घेता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे. भारत आणि न्युझिलंड मालिकेतील १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने अजुन व्हायचे आहेत. आमच्याकडे पैसेच नसतील तर मालिका कशी घेणार अशी भूमिका बीसीसीआयने व्यक्त केली आहे.
बीसीसीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ‘आमचे हात बांधलेले आहेत. देशाचा जगासमोर अपमान होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आम्ही सामने कसे आयोजित करणार? त्याचा खर्च कसा करणार? बँकेची खाती गोठवणे हा काही विनोद नाही. आंतरराष्ट्रीय संघ भारतात आहे. बऱ्याच बाबी पणाला लागलेल्या आहेत.’
लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयने अंमलात आणलेल्या नाहीत, यावरून सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले होते. पेमेंट संदर्भात काही विषयांवरून लोढा समितीने बीसीसीआयची खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत.
पण लोढा समितीने बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले नसल्याचे लोढा समितीशी संबंधित वरीष्ठ वकिलाने दिले. ‘बीसीसीआयने संलग्न संस्थांना देण्याच्या रकमेसंदर्भात हा आदेश आहे. बीसीसीआयच्या इतर कोणत्याही व्यवहारांना रोखलेले नाही,’ असे ते म्हणाले.