जिजाऊंच्या भूमीत मराठा जनसागर!

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन सोमवारी बुलडाणा येथे पाहायला मिळाले. तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि काटेकोर नियोजन व शिस्त येथेही दिसून आली.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि स्वामिनाथन आयोग लागू करणे या मागण्यांसोबतच, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शहीद घोषित करा, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यास पाच हजार सन्मान वेतन द्यावे, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे महिला ग्रामीण विद्यापीठाची स्थापना करावी, या नवीन मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. पहाटे ५पासूनच गावागावातून मराठा समाजाचे जत्थेच्या जत्थे बुलडाण्याकडे कूच करत होते. सातपासून मोर्चेकरी जयस्तंभ चौकात दाखल झाले. अगदी शिस्तबद्धपणे, सुरुवातीला युवती, महिला व त्यानंतर पुरूषांचा मोर्चामध्ये सहभाग होता. मागण्यांच्या वाचनाला ११.३० वाजतापासून सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. दुपारी १२.३० वाजता राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मंचावरील ११ मुलींनी २२ मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

जिजाऊंच्या लेकी मोर्चात!

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ही जिजाऊंची जन्मभूमी! त्यामुळे सकल मराठा क्रांती मूक मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि झेंड्यांसोबतच राष्ट्रमाता जिजाऊंचे छायाचित्र असलेले झेंडे आणि प्रतिमा मोठ्या प्रमाणात दिसून आले.

शहिदांच्या भूमीत वज्रमूठ

नंदुरबार : स्वातंत्र्य लढ्यातील शिरीषकुमार आणि इतर चार बालशहिदांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारात सोमवारी सकल मराठा मूक क्रांती मोर्चाचा एल्गार नंदुरबारकरांनी सोमवारी याची देही, याची डोळा अनुभवला.

वर्षानुवर्षापासून मनात साचलेल्या असंतोषाचा आक्रोश मौनातून प्रदर्शित करीत सकल मराठा समाजाच्या या मोर्चाने नंदुरबारात आजवर निघालेल्या सर्वच मोर्चांचा विक्रम मोडीत काढला. शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देत लाखोंच्या संख्येत समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. महिला आणि विद्यार्थिनींची संख्या लक्षवेधी होती.

च्मोर्चासाठी सकाळी ९ वाजेपासूनच हजारो समाजबांधव विविध वाहनांनी नंदुरबारात दाखल होत होते. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास सहा तरुणींनी पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे पहिले टोक ते शेवटचे टोक असे जवळपास अडीच ते तीन किलोमीटरचे लांब अंतर होते. मोर्चेकरी महिला, तरुण, तरुणी, वृद्ध यांच्या हातात काळे झेंडे, भगवे झेंडे, विविध घोषणा असलेले फलक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *