मराठा समाजाच्या येथे निघालेल्या अतिमहा मोर्चाने केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राचे सरकारही हादरले आणि या महामोर्चाची तपशीलवार बातमी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने पोलीस खात्याने रवाना केल्याची बातमी मोर्चातच पसरल्याने मोर्चेक-यांनी अतिशय शांतपणे पण अधिक जिद्दीने हा मोर्चा यशस्वी केला. १५ लाखांचा मोर्चा?असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. आतापर्यंत निघालेल्या मोर्चात हा महा महा मोर्चा होता.
हातात भगवे झेंडे.. दोन वर्षाच्या चिमुकलीसह ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत लाखो मराठा बांधवांचा सहभाग.. निषेध व्यक्त करण्यासाठी काळा पोशाख.. खचाखच भरलेले होम मैदान आणि रस्ते.. रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यासाठी कार्यरत असलेले स्वयंसेवक.. परगावाहून आलेल्यांना पाणी देणारे मुस्लीम बांधव.. हे चित्र आहे सोलापुरात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे. आज बुधवारी दुपारी जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतर होम मैदानावर मोर्चाने समारोप झाला.
१५ लाखांच्या या मोर्चाने सरकार हादरून गेले आहे. जिल्ह्याच्या कानाकोप-यांतून आलेल्या मराठा बांधवांची जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापाशी सकाळपासूनच गर्दी वाढत होती. दुपारी बाराच्या सुमारास लाखोंच्या संख्येने जमलेले बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. होम मैदानावर हवेत सोडण्यात आलेला फुगा आणि भगवा ध्वज सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांना निवेदन दिल्यानंतर सर्व जण होम मैदानावर जमले. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चेक-यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सोलापूरकरांनी अशा प्रकारे शांततेने निघालेला पहिलाच मोर्चा अनुभवला. कोपर्डी घटनेनंतर राज्यात सगळीकडे मराठय़ांचे मोर्चे निघत आहेत.
या मोर्चाचे वैशिष्टय़ म्हणजे हे सगळे मोर्चे अतिशय शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने काढले जात आहेत. कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा व घोषणाबाजी न करता हे मूक मोर्चे निघत आहेत. मोर्चासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्याच्या कानाकोप-यांत या मोर्चासाठी जनजागृती करण्यात आली. मोर्चाच्या संदर्भात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या. वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने मोर्चासाठी पाठिंबा दिला गेला. सामाजिक संघटनांचा त्यामध्ये मोठया प्रमाणात समावेश होता.