‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ या अजरामर गीताची चाल नेमकी कोणाची?
प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की आणि त्यांनी विविध गीतांना दिलेली चाल आजवर अनेकांच्याच पसंतीस उतरली आहे. पत्की यांनी जाहिराती आणि मालिकांच्या शीर्षक गीतांना संगीत देत त्याची अनेकांना भुरळ घातली. सध्या पत्की चर्चेत आहेत ते त्यांच्या एका मुलाखतीमुळे. अशोक पत्की यांनी नुकत्याच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतरत्न आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ या अजरामर गीताची चाल तयार केली आहे. असा खुलासा पं. भीमसेन जोशी यांचे सुपूत्र जयंत जोशी यांनी केला आहे. अनेक मुलाखतींमध्ये पत्की या गीताला आपणच संगीत दिल्याचे सांगत रसिकांची दाद मिळवतात हे खरे असले तरीही जयंत जोशी यांच्या या खुलाशाने सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या मुलाखतीमध्ये ‘माझ्या कॅसेटवरुन या गीताची चाल घेण्यात आली’ असं पत्की म्हणाले होते. पण एका फेसबुक पोस्टद्वारे पत्कींना खोटं ठरवणारा खुलासा जयंत जोशी यांनी केला आहे. या गीताच्या चालीबद्दल विश्लेषण करताना जयंत जोशी यांनी त्यावेळी घडलेला संपूर्ण प्रसंगच त्यांच्या शब्दांत मांडला. ‘पुण्यातील आमच्या घरीच या गीताची चाल तयार झाली. ‘जो भजे हरीको सदा’चा बेस धरुन या गीताची चाल तयार झाली आणि आपण स्वत: पेटीवर सूर धरला होता’, असे जयंत जोशी यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच ‘पत्कींनी कोणतीही कॅसेट आपल्या वडिलांना दिली नव्हती’ असेही जोशी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘हे गीत नॅशनल इंटिग्रेशन साँग व्हावे असे राजीव गांधी यांना वाटत होते. त्याबाबतचा प्रस्ताव घेऊन जयदीप समर्थ, वसंत बापट, सुरेश मलिक आपल्या घरी आले होते. गीताचे लेखक पियुष पांडे यांनाही हे माहिती आहे. भैरवी हा राग भारतात लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यावर आधारित चाल असावी एवढीच माहिती देण्यात आली होती’, असे लिहित या गाण्याबाबतची आणखी काही माहितीसुद्धा जयंत जोशी यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली आहे.