धुळ्यात शेतकर्‍याच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीमार

धुळे जिल्ह्यात पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. पण या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले असून, शेतकऱयांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांच्या लाठीमारात काही महिला आंदोलक जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याची परिस्थिती अजूनही भीषण आहे. अनेक गावांना अद्याप पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीसाठी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी सकाळापासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू होते. दहा गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांनी शेतकऱयांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनतर शेतकऱयांचा पारा चढला आणि घोषणाबाजीस सुरूवात केली. संतापलेल्या शेतकऱयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे आंदोलक शेतकऱयांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.  गेल्या महिन्यात प्रशासनाकडून पाण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अजूनही पाणी उपलब्ध न झाल्याने शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला होता. पोलिसांना यावेळी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *