‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई होत नसल्याच्या विरोधात सामाजिक सामाजिक संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अलीकडेच ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानंतर पालिकेच्या उपअनुज्ञापन अधीक्षकांनी परिपत्रक जारी करीत या गाडय़ांविरुद्ध अतिक्रमण निर्मूलनांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाईची माहिती न्यायालयाला द्यावयाची असल्यामुळे त्याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. हे परिपत्रक पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीमधील ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ‘शिव वडापाव’च्या गाडीला संरक्षण देण्याची जबाबदारी शिवसेना नेते घेत नसल्याने गाडीचालक प्रचंड नाराज झाले आहेत.पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यानंतर ‘शिव वडापाव’च्या अनधिकृत गाडय़ांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे ‘स्वाभिमान’ संघटनेने शिवसेना आणि पालिका प्रशासनाला आव्हान देत ‘स्वाभिमान वडापाव’च्या गाडय़ा सुरू केल्या होत्या. त्यापाठोपाठ काँग्रेसने ‘कांदेपोहे’ योजनेची घोषणा करीत बेरोजगारांना गाडय़ा उभ्या करून दिल्या. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. दरम्यान, पालिकेची निवडणूक जवळ येत असताना ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई सुरू झाल्यामुळे शिवसेना नेत्यांच्याही पोटात गोळा उठला आहे.