मुंबईत रात्रीपासून दमदार पाऊस, रेल्वे वाहतूक उशिराने

गेले दोन आठवडे दडी मारलेल्या पावसाने गणेश विसर्जनापासून पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी संततधार मात्र कायम आहे. मुंबईत माटुंगा, दादर, वरळी, लोअर परेल, कांदिवली, अंधेरी, बोरिवली मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, पवई या भागांत पाऊस सुरु आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारमध्येही पाऊस पडत आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम असून पाऊस आज दिवसभर पडत राहण्याची शक्यता आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम –
मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला दिसत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. पहाटेची वेळ असल्याने कामाच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने येणा-यांची संख्या खूप असते. त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. रस्त्यांवरील वाहतूक सध्य सुरळीत असली तरी पाऊस असाच कायम राहिला तर नंतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *