कर्नाटकात सुरू असलेल्या कावेरी नदीच्या हिंसाचाराप्रकरणी कर्नाटकचे दोन दिवसांत २२ ते २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा अहवाल ‘असोचेम’ने दिला. या हिंसाचारामुळे वाहतूक सेवा व व्यवसाय बंद पडले आहेत.
कर्नाटकात विशेषत: बंगळुरूत झालेल्या हिंसाचारामुळे शहराच्या सिलिकॉन व्हॅलीच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. बंगळुरू शहरात ५०० कंपन्यांची कार्यालये आहेत. राज्यातील हिंसाचारामुळे वाहतूक ठप्प झाली असून कर्मचा-यांना कार्यालयात जाणे अवघड बनले आहे. यामुळे २२ ते २५ हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
‘असोचेम’चे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, बंगळुरू शहर हे उद्योग व्यावसायिकांचे शहर ओळखले जाते. त्याला या हिंसाचारामुळे धक्का लागला आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली या प्रतिमेला तडा गेला. टीसीएस, इन्फोसिस, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आदी कंपन्यांची कार्यालये बंद आहेत. पाणी ही मूलभूत गरज असून त्या भावनिकता आणून वातावरण तापवले आहे. शांतताप्रिय वातावरण असल्याने बंगळुरू व चेन्नईत देशा-विदेशातील कर्मचारी तेथे काम करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कर्मचा-यांची उपस्थिती अत्यंत तुरळक आहे. दोन्ही राज्यातील पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला. विमानांची तिकिटे रद्द केली जात आहेत. मॉल्स, सिनेमा हॉल्स, रेस्टॉरंट बंद ठेवले आहेत. राज्याचे केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही तर प्रतिमेला मोठा धक्का लागला. या प्रकरणी केंद्र सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवून दोन्ही राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले