अपयशातून घेतली गगनभरारी…!

इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात दोन वर्षे सतत नापास झाल्यानंतरही कठोर परिश्रम करून पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील सागर वाघ याने जिद्दीने मिळवलेले यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारीपदाच्या परीक्षेत ओबीसी गटात द्वितीय क्रमांक त्याने प्राप्त केला.
 
चाळीसगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पातोंडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील निवृत्त कर्मचारी वसंत वाघ यांचा मुलगा असलेल्या सागरचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पातोंडा येथेच झाले. बारावीचे शिक्षण राष्ट्रीय महाविद्यालयात घेतले. बारावीनंतर अभ्यासात साधारण असलेल्या सागरने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मात्र, दोन वर्ष सतत सागरला अपयश आले. त्यामुळे पुन्हा चाळीसगावला पदवीसाठी प्रवेश घेतला. पदवी प्राप्त करण्यासाठी तीन वर्षांऐवजी तब्बल सात वर्षे लागले. अपयश आल्यानंतरही सागरने आपले मनोबल खचू दिले नाही. अखेर पदवी मिळवली. अभ्यासाचा मार्ग बदलावा यासाठी भाऊ योगेश वाघ (तलाठी पुणे) यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळण्यासाठी आग्रह केला. 
 
येथेच यशाची खूणगाठ त्याने बांधली व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सतीश पाटील (पिळोदेकर) व प्रशांत पाटील (बोरखेडेकर) यांनी मार्गदर्शन केले. भगीरथ ॲकॅडमीचे संचालक रंजन कोळंबे यांनी त्याची तयारी करून घेतली. सागरने जिद्दीने वर्ष दीड वर्षाची तयारी करून या परीक्षेत यश संपादन केले. 
 
जानेवारीपासून अभ्यासात केलेल्या तयारीमुळे अपयशी ठरलेल्या सागरने गगनभरारीच घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पातोंड्यातील पहिला राजपत्रित अधिकारी होण्याचा बहुमानही सागरने प्राप्त केला आहे. या यशामुळे गावाचा सन्मान वाढविल्याची प्रतिक्रिया त्याचे वडील वसंत वाघ यांनी व्यक्त केली.
 
अपयशाने खचून न जाता मनाशी निश्‍चयाची खूणगाठ बांधली व प्रयत्न केले तर काही अशक्‍य नाही. मला यशाचा राजमार्ग सापडला आहे. राज्यसेवेची तयारी आतापासून सुरू केली आहे. मला उपजिल्हाधिकारी व्हायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *