लांज्याजवळील अंजणारी घाटीत चालकाचा ताबा सुटल्याने विशाल ट्रॅव्हल्सची आराम बस ४० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसमधील दोघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. १६ प्रवासी जखमी झाले.
हा अपघात रविवारी रात्री २.५१ वाजण्याच्या सुमारास अंजणारी घाटी येथे घडला. अपघातानंतर दोन तास महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. जखमी प्रवाशांवर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवले.
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना घेऊन कोकणात जाणारी खासगी आरामबस भरधाव जात होती. या बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती दरीत कोसळली. ही बस राजेश विश्वनाथ गावकर (जि. सिंधुदुर्ग) यांच्या मालकीची आहे. गणेश नारायण डामरे ही बस मुंबईहून कणकवलीकडे घेऊन चालला होता.
तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी ४ वाजता परळ येथून ही बस घेऊन भुजबळ हे निघाले होते. शनिवारी रात्री १० वाजता ही बस महाड येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर पाली येथे बदली चालक गणेश डामरे याने ही बस चालवण्यास सुरुवात केली.
पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. त्यामुळे बस दरीत कोसळल्यानंतर एकच कोलाहल माजला. त्यातच काळोख आणि धुके असल्याने आतील प्रवाशांना काहीच दिसत नव्हते. या अपघातात प्रकाश रावजी लब्दे (रा. विरार) आणि कृष्णा दत्ताराम कुळये (रा. सांताक्रूझ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १६ प्रवासी जखमी झाले. या सर्व प्रवाशांच्या हात, पाय तसेच डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.