सोनं गहाण ठेवून कर्ज

सोने आणि सोन्याचे दागिने याची ओढ नसणारी भारतीय स्त्री विरळच! गृहलक्ष्मीला सोन्यानं मढविणारे तर त्यामध्ये (स्त्रीधन वाढवले म्हणून) स्वत:चं कर्तृत्व मानतात. आज स्त्रियांप्रमाणे सोने मिरवणारे सद्गृहस्थ (नेते) टीव्हीवरून झळकत असतात. मध्यपूर्वेतील देशांचे पर्यटन करताना तेथून ‘चोख सोनं’ आणणं, हा एक महत्त्वाचा खरेदी कार्यक्रम असतो.
जगभरात सोन्याचं आकर्षण प्रचंड आहे. कारण सोन्याचं मूल्य, जे सतत वाढत असतं. ती गुंतवणूक सुरक्षित आणि जगात कुठेही चालणाऱ्या चलनासारखी ठरते. विकून पटकन पैसे उभे करता येतात. मात्र आपल्याकडे ‘स्त्रीधन’ असा शिक्का असलेलं प्रचंड प्रमाणातलं सोनं असतं ते दागिन्यांच्या स्वरूपात. आणि म्हणूनच ते ‘विकून पैसा उभा करणं’ हे परंपरेला भावनिक पातळीवर मान्य नसतं. म्हणून सोनं गहाण ठेवून – म्हणजेच दागिने गहाण ठेवून कर्ज काढणं जास्त समाजमान्य ठरत आहे. शिवाय ‘दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली’ या सुस्काऱ्यात एक अगतिकताही दडलेली दिसते. कारण तो अडचणीच्या काळात पैसा उभा करण्याचा सर्वात शेवटचा उपाय ठरतो!
आता ‘गोल्ड लोन’ देणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती आपलं लक्ष वेधून घेत आहेत. बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकारच या जाहिराती करतात. दागिन्यांच्या बदल्यात कर्जाऊ मिळणाऱ्या पैशांवर काय दरानं व्याज आकारलं जातं, परतफेडीच्या अटी काय, हप्ते काय इ. माहिती त्या जाहिरातीतून समजत नाहीच. फक्त पैसे उभे करण्याचा हा ‘सोपा मार्ग’ आहे, असा संदेश मात्र ग्राहकाकडे जातो.
सोनं कर्ज सोपं  वाटतं, कारण…
* वेळ कमी लागतो. अगदी दोन ते तीन दिवसात कर्जाची रक्कम हातात मिळते.
* कर्ज मंजूर करताना प्रश्न कमी विचारले जातात.
* कागदपत्रांची संख्या कमी असते.
* उत्पन्नाचे दाखले, पगार-पत्रक इ. काहीही द्यावं लागत नाही. कारण चक्क सोनंच गहाण असताना या सर्वांची गरजच काय?
* दरमहा फक्त व्याज भरा आणि मुदत अखेरीस पूर्ण परतफेड करा, अशी आकर्षक सवलत असते. (पैसे उभारण्याची निकड असलेल्याला ही ‘सोय’ खूपच आवडते.)
आपल्याला सोयीनं परतफेडीचा कालावधी ठरवून (जास्तीत जास्त सात वर्षे) त्यानुसार हप्ता बांधून घेता येतो. यामागे जे गणित असतं ते सामान्य कर्जदाराला उमजणं कठीण असतं.
कर्ज कसं व किती मिळतं?
सोन्याच्या एकूण मूल्याच्या ७० ते कमाल ७५ टक्के रक्कमच कर्ज (छङ्मंल्ल ३ङ्म श्ं’४ी) म्हणून मिळतं. दरमहा फक्त व्याज घेतलं तर अखेरीस सोनं विकून ही परतफेड करावी लागू शकते. हे व्याज भरण्यात कुचराई झाली तर चक्रवाढ व्याज लागतं. शिवाय वसुलीसाठी तगादेही लागतात.
व्याजाचा दर कर्जदाराप्रमाणे (त्याचं जे मूल्यमापन फायनान्स कंपनी करेल, त्यानुसार) बदलतो असं दिसतं. दर साल-दर शेकडा १२ ते २४ पर्यंत कितीही दर असू शकतो. पण सामान्य कर्जदार हप्ता किती बसतो, परवडेल का, असा विचार करतो.
सोन्याचं एकूण मूल्य ठरवणं आणि प्रक्रिया याचा चार्ज कर्जदाराला भरावा लागतो. मूल्य ‘कसं ठरवलं’ हे नेहमी कर्जदाराला कळतंच असं नाही. कमी उत्पन्न गटातील व्यक्ती असं कर्ज घेत आहेत असंही दिसून येतं.
गहाण ठेवलेल्या सर्व दागिन्यांची तपशीलवार यादी आणि कर्जाचा करार करताना अनेक कंपन्या कर्जदाराला जणू गृहीत धरतात.
सोन्याची किंमत कमी झाली, तर अर्थात गहाण सोन्याचं एकूण मूल्य घटतं. अशावेळी कर्जदाराकडे अधिक सोन्याचा तगादा लावणं किंवा मोठी रक्कम परतफेडीपोटी भरण्याचा दबाव आणणं असेही प्रकार यात घडतात. इतकंच नव्हे तर मुदत अखेरीस कर्जदाराच्या नकळत त्याच्या गहाण सोन्याचा लिलाव करून टाकण्याच्या घटनाही घडतात.
या पार्श्वभूमीवर कर्ज घेण्यापेक्षा सोनं विकून पैसा उभा करणं हे आर्थिकदृष्ट्या अधिक शहाणपणाचं ठरू शकतं. उदा. सोन्याचा भाव २८८०/- रुपये एका ग्रॅमचा असे गृहीत धरू या.
कर्ज हवं आहे- रुपये एक लाख.
त्यासाठी सोनं तारण हवं ५० ग्रॅम. म्हणजे १,४४,०००/- रुपयांचे हा छङ्मंल्ल ३ङ्म श्ं’४ी चा कंपनीचा नियम!
एक लाख रुपये कर्जावर दरमहा २ टक्के व्याज (जास्तीत जास्त) लागणार आहे व २५०० रुपयांचा मासिक हप्ता भरून हे कर्ज सव्याज फिटण्यास सात वर्षे (८४ महिने) लागतील (हे कंपनीचं गणित आहे) मगच आपलं ५० ग्रॅम सोनं परत मिळेल. कर्जदारानं सर्व मासिक हप्ते वेळेवर भरलेत आणि सोन्याचा भाव स्थिर आहे असं इथे गृहीत धरलं आहे. इथे एकूण २,१०,०००/- रुपये परतफेडीपोटी भरले जातील.
कर्जापेक्षा विकणं परवडेल?
समजा, कर्ज न घेता ‘सोनं विकायचं’ असं ठरवलं तर एक लाख रुपये उभे करण्यासाठी ३५ ग्रॅम सोनं विकावं लागेल. म्हणजे १५ ग्रॅम सोनं आपल्याकडेच राहील. परतफेडीसाठी जे २५०० रुपये द्यायचे होते त्याचे दरमहा, नियमितपणे सोनं खरेदी केलं तर ४० महिन्यात एक लाख रुपयाचं सोनं खरेदी करून होईल. सोन्याच्या भावानुसार ते ३५ ग्रॅमच भरेल असे नाही. पण जी व्यक्ती परतफेडीचे हप्ते भरेल त्यापेक्षा ४० महिने कमी वेळात आपलं बरचंसं सोनं घेऊन झालेलं असेल, हे नक्की.
शिवाय, जर शक्य नसेल तर एक-दोन महिने आपण हे २५०० रुपयांचं सोने नाही खरेदी केलेत तरी नुकसान काही नाही.
हे गणित एकदा नीट समजलं की निकड दूर करण्यासाठी सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्यापेक्षा ते विकणंच अधिक फायदेशीर आहे, असं लक्षात येईल.
पण.. फक्त त्यात एक भावनिक मुद्दा राहतो, म्हणजे सासूबार्इंचा परंपरागत दागिना, घराण्याची ओळख असणारे ‘पूर्वजां’चे दागदागिने विकायचे कसे? पण यावर चर्चेनं व विवेकानं मात करून गरज भागविण्यापुरतं सोनं विकलं तर पुढचा मनस्ताप टळू शकतो. आपलं आर्थिक गणित नीट करून ताळा जमवणं हे महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *