गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणा-या गणेशभक्तांना २-३-४ या तीन दिवशी मुंबई-पुणे महार्गावरून टोलमाफी देण्यात येईल, अशी सरकारने केलेली घोषणा धादांत फसवणूक ठरली आहे.
कोकणात जाणा-या गणेशभक्तांनी या टोलमाफीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आपल्या गाडीवर लावण्यासाठी स्टीकर घ्यावेत, ते स्टीकर लावल्यावर टोलमाफी दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात अशा कोणत्याही स्टीकरची व्यवस्था एमएसआरडीसी वा आरटीओ कार्यालयात नसल्याचे अधिका-यांनी सांगितले. शिवाय २०० रुपयांच्या टोलमाफीसाठी एमएसआरडीए कार्यालयात जाण्यासाठी २०० रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असल्याने कोकणातील भक्तांना याचा फायदा होत नाही. शिवाय वेळ फुकट घालवून खेपा घालणा-या प्रवाशांची फसवणूक झाली आहे.
ज्यांना कोकणात जायचे आहे, त्यांनी मुंबईतील आपला पत्ता आणि कोकणात कुठे जायचे आहे त्या घराचा पत्ता यांसह अगोदर अर्ज करावा, असे फर्मान दळणवळण बांधकाम विभागाने काढले होते. त्यानुसार काही गणेशभक्तांनी बांधकाम खात्याच्या कार्यालयाशी संपर्क केला असता अधिका-यांनी कानावर हात ठेवले. पोलिसांनाही तसे आदेश मिळालेले नाहीत.