बालासोर जिल्ह्यात मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याने वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर गाठोड्यात बांधून ते खांद्यावरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. 25) घडली.
थुआमुल रामपूर विभागातील मेलघरा गावातील रहिवासी दानू मात्झी यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी रुग्णालयाने शववाहिका देण्यास नकार दिल्याने आदिवासी नागरिकाने स्वतःच्या खांद्यावरून मृतदेह दहा किलोमीटरपर्यंत वाहून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर 24 तासातच ही घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
सलमानी बेहरा (वय 80) या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. अपघातानंतर मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याने मृतदेहाचे तुकडे करून ते गाठोड्यात बांधण्यात आले. दोन कर्मचाऱयांनी ते गाठोडे उचलून स्टेशनवर पोचवल्याने आज पुन्हा खळबळ उडाली आहे.
रेल्वे पोलिसचे अधिकारी प्रताव रुद्र मिश्रा यांनी सांगितले की, ‘अपघातानंतर शवविच्छेन करण्यासाठी मृतदेह बालासोर जिल्हा रुग्णालयात पाठविणे गरजेचे होते. परंतु, शववाहिका उपलब्ध होऊ शकली नव्हती. मृतेदह रुग्णालयात पोचविण्यासाठी 1000 रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. परंतु, स्थानिक या कामासाठी 3500 रुपयांची मागणी करत होते. दोन कर्मचारी काम करण्यास तयार झाले होते. परंतु, मृतदेह कडक झाल्यामुळे घटनास्थळावरून हलविणे शक्य नव्हते. यामुळे मृतदेहाचे तुकडे करून ते बाहेर काढण्यात आले.‘
दरम्यान, आपल्या आईचा अशा पद्धतीचा मृतदेह पाहून रविंद्र यांना धक्का बसला आहे. पोलिस व नागरिकांमध्ये माणुसकीच उरलेली नाही. रेल्वे पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असे रविंद्र यांनी सांगितले.