दहीहंडीची उंची आणि गोविंदाच्या वयाची न्यायालयाने ठरवून दिलेली मर्यादा यंदाच्या उत्सवापुरती शिथील करावी या मागणीची ‘जय जवान’ गोविंदा पथकाची पुनर्विचार याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. परिणामी, दहीहंडीची उंची २० फुटाच्या आत आणि गोविंदा १८ वर्षांवरीलच असतील.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी अंतरिम स्थगिती दिली होती; परंतू न्यायमूर्ती ए. आर. दवे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी जय जवान मंडळाने याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत दहीहंडीची उंची २० फुटांपर्यंतच कायम ठेवण्यास सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मागच्या बुधवारी दहीहंडीची उंची २० फूटापेक्षा जास्त असू नये तसेच गोविंदा पथकात १८ वर्षाखालील गोविंदाच्या सहभागावर बंदी घातली होती.
याप्रकरणी दहीहंडीला खेळाचा दर्जा आहे, त्यामुळे १८ वर्षांच्या वयोमर्यादेला दहीहंडी पथकांचा विरोध नव्हता. मात्र २० फूट इतकीच उंची ठेऊ नका, त्यामुळे खेळाचे स्पिरीट कमी होते, असा दावा गोविंदा पथकांच्या वतीने जय जवान दहीहंडी पथकाच्या वकिलांकडून करण्यात येत होता.
मात्र हा खेळ ऑलिंपिकमध्ये नोंद आहे का? ऑलिंपिकमध्ये तुम्ही पदक आणणार आहात का? तसे झाले तर आनंद आहे, अशी मिश्किल टिपण्णी न्यायालयाने केली.
दरम्यान, मूळ याचिकेवर अंतिम सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यावेळी अन्य पथकांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल. मात्र त्यावेळी होणारा तो निर्णय अंतिम असेल.
दरम्यान, न्यायालयाने लादलेल्या निर्बंधाविरोधात जय जवान मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचाच भाग म्हणून, गेल्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणा-या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक मनो-यांचा स्पेनचा २२ वर्षांचा विक्रम या मंडळाने गेल्यावर्षी मोडीत काढला होता.