पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक भारताचेच

पाकव्याप्त काश्मीरातील नागरिक भारताचेच असून त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी धाडसी भूमिका गुरुवारी भारताने जाहीर केली.

बलुचिस्तान, गिलगीट व पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकांबद्दल आपली काय भूमिका आहे त्यावर परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरातील नागरिक आमचेच आहेत. त्यांच्या मदतीसाठी आम्ही जे शक्य असेल ते करू. या भागातील नागरिकांना थेट पाठिंबा देण्याची भारताची पाहिलीच वेळ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावेळी पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान व गिलगिट येथील नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या भावना कळवल्या आहेत. त्यांना योग्य तो प्रतिसाद देणे पुरेसे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मिरातील मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबत आणि अत्याचारांच्या विरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी बलुचिस्तानबाबत केलेल्या विधानाबाबत खुलासा करताना ते म्हणाले की, भारताच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी बलुचिस्तान, गिलगीट व पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकांना धन्यवाद दिले. गेल्या आठवडय़ात झालेल्या काश्मीरबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्यावरून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केला. त्यानंतर भविष्यातील वाटचालीबाबत पंतप्रधान मोदी यांनी निर्देश दिले आहेत. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची माहिती देण्यास असमर्थ असल्याचे स्वरूप म्हणाले.

चर्चेचा चेंडू आता पाकिस्तानकडे

भारत आणि पाकिस्तान दरम्यान परराष्ट्र सचिव पद पातळीवर होणा-या चर्चेचा चेंडू पाकिस्तानच्या दारात अहे. आम्ही सीमेपलिकडील दहशतवादावर चर्चा करायला तयार आहोत, असे स्वरूप यांनी सांगितले. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांच्याशी सीमेपलिकडील दहशतवादावर चर्चा करायला तयार असल्याचे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा वापर राजनैतिक कारणासाठी करत आहे. अस आरोप जयशंकर यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *