गुजरात सरकारने प्रत्येक दलित कुटुंबाला पाच एकर जमीन देण्याची मागणी मान्य केली नाही तर रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारो दलितांनी शक्तिप्रदर्शन केले. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वच वक्त्यांनी टीका केली. या वेळी हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला याची आई राधिका वेमुला व उना मारहाणीतील एका पीडिताचे वडील बालू सर्वया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार कार्यक्रमाला उपस्थित होता.
मृत गाईचे कातडे काढताना उनामध्ये दलितांना मारहाण झाल्याचे उघड झाल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी दलित अत्याचार लढत समितीतर्फे अहमदाबाद ते उना अशी आठवडाभर यात्रा काढण्यात आली. या समितीचे प्रमुख जिग्नेश मेवानी यांनी तुम्ही गाईची शेपटी घ्या, आम्हाला जमीन द्या, अशी घोषणा केली. तसेच गाईचे कातडे काढण्याचा व्यवसाय करणार नाही अशी शपथ या वेळी देण्यात आली. २०१२ मध्ये आणखी एका घटनेत तीन युवक ठार झाले होते, त्या वेळी मोदींनी मौन बाळगले होते. मात्र आता देशभर पडसाद उमटल्यावर मोदींना प्रतिक्रिया द्यावी लागली, असे मेवानी यांनी स्पष्ट केले.
विकासाचा नुसताच फुगा
मोदींनी गवगवा केलेल्या विकासाचे प्रारूप या निमित्ताने उघड झाल्याची टीका कन्हैयाने केली. आम्हाला जातीव्यवस्थेपासून मुक्ती हवी आहे. आणखी अत्याचार सहन करणार नाही, असा इशाराही कन्हैयाने दिला. गुजरातमधील दलित आंदोलनामुळेच आनंदीबेन पटेल यांना
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. माझ्या मुलाप्रमाणे इतर दलित मुलांना अत्याचाराला तोंड द्यावे लागणार नाही अशी अपेक्षा राधिका वेमुला यांनी व्यक्त केली. या वेळी मोठय़ा संख्येने मुस्लीम उपस्थित होते. या वेळी आनंद पटवर्धन उपस्थित होते.