इस्लाम धर्माने बंधुभाव, मानवतेची शिकवण दिली आहे; परंतु काही दुष्ट प्रवृत्ती इस्लाम धर्माच्या व ‘जिहाद’च्या नावाखाली संपूर्ण जगात रक्तपात घडवून आणत आहेत. या देशातील मुसलमानांच्या नसानसात देशप्रेमाची भावना रुजलेली आहे.
क्षमा, शांतीचा संदेश देणा-या इस्लाम धर्माचा दहशतवाद आणि ‘इसिस’ संघटनेशी काहीही संबंध नाही, असा सूर ‘इस्लाम धर्माचे खरे स्वरूप आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद’ या विषयावर आयोजित परिसंवादात उमटला.
विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि अखिल भारतीय मुस्लीम बुद्धिजीवी विचारमंच यांच्या संयुक्त एमआयटी कॅम्पसमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात क्रांतिदिनाचे औचित्य साधून या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक अनिस चिश्ती, मौलाना रझिन आश्रफ नद्वी, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा आदींनी आपले विचार मांडले. बुद्धिजीवी विचारमंचाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण यांनी परिसंवादाचे संयोजन केले.
या परिसंवादात डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, माणसाला माणसाशी जोडण्याची कृती म्हणजे धर्म असतो. सुफी संतांनी धर्माचा खरा आणि योग्य अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले. म्हणून ते सुफी संत भारतात आले. कारण भारत हा अतिशय सहिष्णू देश आहे. त्याचबरोबर सर्वाधिक मुस्लीम भारतात राहतात. त्यामुळे हिंसा आणि जातीभेद याला आपल्याकडे थारा देता कामा नये.
या धर्माध शक्ती इस्लाम धर्माला नाहक बदनाम करत आहेत. त्यामुळे मुस्लीम तरुणांनी इसिससारख्या अधर्मी संघटनांना बळी न पडता इतर धर्माचाही आदर केला पाहिजे. मौलाना अश्रफ नद्वी म्हणाले, भारतभूमी ही सर्वाधिक सुरक्षित आणि पवित्र अशी भूमी आहे.
आमचा श्वास या भूमीत असून, देशाप्रती प्रामाणिक सेवाभाव आमच्यात आहे. त्यामुळे दहशतवादी कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. दहशतवादाचा व इसिस या संघटनेचा इस्लामशी काहीही संबंध नाही; परंतु मुस्लीम तरुणांना यात गोवले जात आहे. लहानपणी हिंदू-मुस्लीम ऐक्य पाहिले होते; मात्र आज हेच एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहून दु:ख होते. देशात शांततेचे वातावरण राहावे, यासाठी आपण प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. तरुणांत धर्माच्या शिकवणीबद्दल जागृती व्हायला हवी.
अनिस चिश्ती म्हणाले, मुसलमान व इस्लामला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. इस्रयलमधली एक दहशतवादी संघटना इस्लामच्या रक्षणाचा बनाव करते आहे. त्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर राहायला हवे.
कोणताही धर्म हा सनातन, वैश्विक असतो. इस्लाम धर्माने तर कधीही सूडबुद्धीने वागण्याची शिकवण दिलेली नाही. दुश्मनालाही क्षमा करण्याचा संदेश या धर्मात आहे. देशप्रेम प्रत्येकाच्या मनात जन्मजातच असते. त्यामुळे इस्लाम धर्माने कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
डॉ. कराड म्हणाले, क्रांतिदिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमातून इस्लाम धर्माचा खरा संदेश युवा पिढीपर्यंत जावा. सर्व धर्माची मूल्ये, शिकवण एकसारखीच आहे. आपल्या कर्तव्याचा हक्क बजावणे म्हणजे खरा धर्म असून, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये जीवन कसे जगावे, याची दिशा दिलेली आहे.
धर्माच्या, जिहादच्या नावावर दहशतवाद, िहसाचार करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. नमाजाच्या माध्यमातून प्रत्येक मुस्लीम आपल्या भारतमातेला वंदन करत असतो.