शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या शनिशिंगणापूर प्रशासनाच्या विरोधातील महिला संघटनांनी दिलेला लढा व त्यानंतर शनिचौथऱ्यावर मिळालेला प्रवेश हे संपूर्ण राज्याने पाहिले. आता त्याच शणिशिंगणापुरात महिलांच्या गोरखनाथ दहीहंडी पथकाला शनिशिंगणापूरच्या विश्वस्तांनी गोपाळकाल्यासाठी आमंत्रण दिले आहे.
गोरखनाथ दहीहंडी पथकाने महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचवली आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी या पथकाने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये दहीहंडीचे सादरीकरण करीत महाराष्ट्राची संस्कृती पोहोचवली. यंदा मात्र या पथकाला शनिशिंगणापूरच्या विश्वस्तांकडूनच बोलावणं आलं आहे. येथे महिलांनी येऊन दहीहंडी फोडावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. शनिशिंगणापूरला महिलांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे; मात्र या परिस्थितीत विश्वस्तांनी स्वतःहून आमच्या गोपिकांना दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन दहीहंडी फोडण्याचे निश्चित केले असल्याचे गोरखनाथ दहीहंडी पथकाचे प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.
