भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना पाकिस्तानमध्ये येऊ देवू नका, असा इशारा पाकिस्तान सरकारला लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याने दिला आहे.
सार्क परिषदेसाठी राजनाथसिंह 3 ऑगस्टला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इस्लामाबादमध्ये सार्क परिषद होत असून, या बैठकीला ते हजर राहणार आहेत. त्यापूर्वी 26/11 चा मास्टरमाईंड असलेल्या सईदने गरळ ओकत पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्याने हे वक्तव्य केले आहे.
सईद म्हणाला की, पाकिस्तान सरकारने राजनाथसिंहांना पाकिस्तानमध्ये येऊ दिले नाही पाहिजे. काश्मीरमधील निष्पाप नागरिकांची हत्या होण्यासाठी राजनाथसिंह जबाबदार आहेत. सार्क परिषदेसाठी ते इस्लामाबादला आले तर देशभर आंदोलन करण्यात येतील. राजनाथसिंह यांचे स्वागत करून पाकिस्तान सरकारने काश्मीरी बांधवांच्या लढ्याचा अपमान करु नये. इस्लामाबादसह लाहोर, कराची, पेशावर, क्वेटा, मुल्तान, फैसलाबाद, मुजफ्फराबाद आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.