महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे (बालभारती) यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात चौथीच्या इतिहास पुस्तकातील दोन धडे कमी केले आहेत. दोन धडे जरी कमी केले असले, तरी त्याचा आशय कायम ठेवल्याचे मत बालभारतीने व्यक्त केले आहे.
चौथीच्या इतिहास पुस्तकाचे नाव “शिवछत्रपती‘ असे आहे. त्याचबरोबर परिसर अभ्यास दोन असाही उल्लेख त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. 2013-14 या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्या वेळी तयार केलेल्या पुस्तकात 20 धडे होते. मात्र, त्याची दुसरी आवृत्ती एप्रिल 2016 मध्ये काढली आहे. त्यामध्ये पहिल्या आवृत्तीमधील शिवरायांची युद्धनीती, रयतेचा राजा, स्फूर्तीचा जिवंत झरा, राज्यकारभाराची घडी बसविली हे चार धडे नव्या आवृत्तीमधून वगळले आहेत. तर नव्या आवृत्तीमध्ये गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या दोन नव्या धड्यांचा समावेश केला आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात चार धडे कमी केले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जे धडे कमी केले आहेत, त्या धड्यातील सर्व आशय नव्याने घेतलेल्या दोन धड्यांमध्ये समाविष्ट केला आहे. मुलांच्यादृष्टीने हे चांगले आहे. ज्ञानरचनावादाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रेही या पुस्तकामध्ये आहेत.
– मोगल जाधव, सदस्य सचिव, इतिहास विषय समिती.