पावसाने जुलै महिन्याच्या दुसर्या टप्प्यात काहीशी ओढ दिली असली, तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस बरसण्याचे संकेत हवामान विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
मान्सून केरळमध्ये सरासरीपेक्षा उशिरा दाखल झाला. मात्र, पोषक वातावरणामुळे त्याची वाटचाल जोरदार होती. परंतु, अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार होणे आवश्यक होते. ती न झाल्याने जून महिना कोरडाच गेला. महाराष्ट्रात यावर्षी विदर्भाच्या बाजूने मान्सूनने आगमन केले. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तुलनेत मध्य महाराष्ट्रात पावसाने जून महिन्यात चांगलीच ओढ दिली होती. जुलै महिना सुरू होताच पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागातील जुलै महिन्याची सरासरी पूर्ण होत आली आहे. परंतु, उर्वरित सरासरी पूर्ण होण्यासाठी अजूनही जोरदार मुसळधार पावसाची गरज आहे.
जुलै महिन्याच्या दुसर्या टप्प्यात मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून, मान्सूनचा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावला आहे. त्यामुळे हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानसह जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. असाच पाऊस महाराष्ट्रातील कोकण, विदर्भात 15 जुलैपासून बरसत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाचा जोर धिमाच आहे. परंतु, ही स्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बदलण्याची शक्यता तयार झाली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात या दोन्ही महिन्यात हवेच्या वरच्या भागात ‘चक्रीय स्थिती’ तसेच कमी दाबाचे क्षेत्र वारंवार तयार होण्याची शक्यता वाढली आहे. या परिणामामुळे पुढील दोन महिने महाराष्ट्रासह बहुतांश राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.