राज्यातील कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चोवीस तासांत घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस पडल्यामुळे धरणसाठ्यातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान 24 जुलैपर्यंत राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
कोकणात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली होती. परंतु, मंगळवारपासून याही भागात पाऊस पडू लागला आहे. सध्या मान्सूनचा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी आहे.त्यामुळे उत्तर भारतातही पावसाने जोरदार सुरूवात केली आहे.बिहार,उत्त्तर प्रदेश आणि झारखंड, उत्तराखंड या राज्यासह ईशान्य भारतातील राज्यात पाऊस धुमाकूळ घालीत आहे.
बिहार आणि आसपासच्या भाग ते पंश्चिम बंगालपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती असून,त्याची तीव्रता कायम आहे. त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते केरळच्य किनारपट्टीपर्यत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे.तर बंगाल उपसागरातील मध्यपूर्व भागापासून ते उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रात सध्या सिस्टिम प्रभावी असल्यामुळे राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.पुढील 24 जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
घाटमाथ्यावरसुध्दा पाऊस जोरदार हजेरी लावीत आहे. अंबोणे, भिवपुरी, शिरोटा,कोयना, लोणवळा, डुंगरवाडी, वळवण, दावडी, खोपोली, खंद, भिरा, ताम्हिणी या भागात गेल्या चोवीस तासांत 10 ते 80 मिलिमीटर पाऊस पडला आहे.