आंबोलीला वर्षा पर्यटनाचे वेध लागले आहेत. येत्या आठवड्यानंतर धबधबे पूर्ण क्षमतेने वाहणार आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीही पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. पोलिस प्रशासन, व्यापारी आणि स्थानिक ग्रामस्थ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
आंबोलीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली आंबोली थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गाच्या हिरवळीने नटलेली आहे. त्यात सावंतवाडी वन विभागाने यात आणखी भर घातली आहे. आंबोलीत दर्शन देणाऱ्या अस्वल, शेकरू आदी प्राण्यांची माहिती त्यांनी घाटात फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धबधबे, तसेच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या परिसराचा विकास करण्यात आला आहे. पोलिसांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. दरडीचा धोका तूर्तास तरी नाही. आयत्या वेळी काही घडेल, हे सांगता येत नाही; परंतु कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात होऊ नये, यासाठी बांधकाम विभागाकडून दक्षता घेण्यात आली आहे.
एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होणार आहेत. त्या दृष्टीने पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाल्याचे चित्र आहे.