नौदलाच्या शहीद जवानास सन्मानाची प्रतीक्षा

विशाखापट्टणम येथे झालेल्या हुडहुड वादळात नौदलात सेवा बजावताना शहीद झालेल्या माजगाव येथील शुभम सावंत यांच्या कुटुंबीयांवर शौर्यपदक मिळविण्यासाठी नौदलाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. आपला एकुलता एक मुलगा आपण देशासाठी गमावला, त्याचे दुःख नाही; परंतु त्याचा मरणोत्तर यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

शहराला लागूनच असलेल्या माजगाव येथील शुभम उदय सावंत यांना अठराव्या वर्षी नौदलात काम करण्याची संधी मिळाली होती. देशसेवा आणि मिळालेली नोकरी लक्षात घेता त्याला घरातील मंडळींनी जाण्यास सांगितले.

शुभम यांचा प्रवास उलगडताना त्यांचे वडील उदय सावंत यांनी सांगितले की, 2013 ला आपला मुलगा नौदलात भरती झाला. त्याला लिपिक या पदासाठी नियुक्त करण्यात आले; मात्र प्रशिक्षणादरम्यान विशाखापट्टणम येथे सेवा बजावत असताना परिसरात मोठे वादळ आले. या वेळी तेथे कार्यरत असलेल्या वरिष्ठांनी त्याच्यासह अन्य तिघांना वादळात रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यास तसेच तेथील लोकांना सहकार्य करण्यास चला, असे आदेश दिले.

वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे जीवाची पर्वा न करता शुभम आणि त्याचे साथीदार भरवादळातच कामगिरीवर गेले; मात्र वादळात भले मोठे झाड त्यांच्या अंगावर पडले आणि तो जागीच शहीद झाला, हा प्रकार 12 ऑक्‍टोबर 2013 ला घडला. त्याचे पार्थिव सावंतवाडी-माजगाव येथे आणण्यात आले. सावंतवाडीकर आणि सैन्याच्या तुकडीद्वारे सलामी देत त्याला साश्रु नयनांनी निरोप देण्यात आला.

दरम्यान, तेथे आलेल्या नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमचा मुलगा शहीद झाला आहे. त्यामुळे त्याला शौर्यपदक देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली प्रक्रिया आपण पूर्ण करतो. वर्षभरात ते मिळेल, असे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर आजअखेरपर्यंत शहीद शुभमला शौर्यपदक मिळालेले नाही.आपला मुलगा देशासाठी शहीद झाला आहे. त्यामुळे त्याचा मरणोत्तर सन्मान झालाच पाहिजे; मात्र अद्याप त्याला न्याय मिळालेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पदकाची प्रक्रिया पूर्ण झाली की नाही याबाबत माहिती घेण्यासाठी ते दोन वेळा विशाखापट्टणम येथील नौदलाच्या कार्यालयात जाऊन आले; मात्र त्यांना तेथे कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तेथील या घटनेच्या वेळी कार्यरत असलेले अधिकारी बदलून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे श्री. सावंत हे नाराज झाले आहेत. एकुलता एक मुलगा देशासाठी वाहिला आणि त्यानंतरसुद्धा अशा प्रकारे उत्तरे मिळत असतील, तर चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे असून, आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *