३० मे २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्याने एक वर्षानंतर पुन्हा एकदा म्यानमारमध्ये प्रवेश केला आणि नागा व मणिपुरी बंडखोरांच्या प्रशिक्षण कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये सैन्याच्या आसाम रायफल तुकडीने भाग घेतला होता. या हल्ल्यामध्ये ८ बंडखोरांना मारण्यात यश मिळाले आहे. तसेच इतर १८ बंडखोरांना पकडण्यात आले आहे. हा कमांडो हल्ला संपल्यानंतर पकडलेले १८ बंडखोर म्यानमार सैनिकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. २२ मे २०१६ रोजी मणिपूरमध्ये भारतीय सैन्यावर नागा व मणिपुरी बंडखोरांनी हल्ला केला होता, त्यामध्ये सहा भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ही कारवाई केली. या हल्ल्याविषयी सरकारकडून किंवा सैन्याकडून कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. काही माध्यमांमधूनच हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. असे का करण्यात आले? याचे कारण अशा कारवायांचे वृत्त प्रसारित झाल्यामुळे बंडखोर चौकस होतात आणि आपले प्रशिक्षण केंद्र, राहण्याच्या जागा बदलतात. कदाचित म्हणूनच, यावेळी या हल्ल्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अर्थातच, हा हल्ला म्यानमार सरकारशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे करण्यात आला.