पुण्यातील पाणी कपात सुरूच राहणार असून, आज (मंगळवार) खडकवासला प्रकल्पाच्या कालवा समितीची बैठक मुंबईत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणांत पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत ही बैठक घेणार नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरी़श बापट यांनी आज सकाळी ‘सकाळ‘ शी बोलताना स्पष्ट केले.
खडकवासला प्रकल्पामध्ये 15.5 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. पुण्याला गेले दहा महिने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या पाणीपुरवठ्यात 30 टक्के कपात सुरू आहे. ती आणखी काही दिवस सुरूच राहील. ती रद्द करून रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी केली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या मागणीवरुन काल गोंधळ झाला. कालवा समितीच्या बैठकीत पाणी वापराचे नियोजन केले जाते.
कालवा समितीची बैठक आज होणार होती. त्यासंदर्भात विचारणा केली असता, बापट म्हणाले, “धरणांत पुरेसा साठा झाल्यानंतरच कालवा समितीची बैठक घेऊ. खडकवासला धरणात सध्या जादा येत असलेले पाणी कालव्याद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी देत आहोत.तलावात पाणीसाठा वाढविला जाईल. पाझर झाल्याने विहिरीची पाणीपातळी वाढेल. खरीप पिकांना पाणीपुरवठा करताना पिण्याचे पाणी देण्यासाठी तलाव भरण्याची चिंता राहणार नाही. चासकमान धरणाच्या कालवा समितीची बैठक आज होणार आहे.”