अतिवृष्टीमुळे गेले चार दिवस जिल्ह्यात आलेल्या पुराने 390 फेर्या रद्द होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कोल्हापूर विभागाला सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा झाला. दुसरीकडे याच कालावधीत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी सोडलेल्या जादा गाड्यांमुळे जवळपास पन्नास लाख रुपयांचा फायदा होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे जरी पुराने मारले असले तरी एस.टी.ला पंढरपूरच्या वारीने चांगलेच तारले आहे.
शुक्रवार आठ जुलैपासून कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीला सुरुवात झाली. त्याचा जोर साधारणपणे बुधवारी (दि.12) पहाटेपर्यंत राहिला. या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच मोठे नाले आणि नद्यांना पूर आल्याने तीसहून अधिक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रत्नागिरी महामार्गासह गगनबावडा, आजरा, गडहिंग्लज, चंदगड मार्गांवरील एस.टी.ची वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. त्यामुळे चार दिवसांत एस.टी.बसेसच्या 390 फेर्या रद्द कराव्या लागल्या. जवळपास 18 हजार 138 किलोमीटरचा प्रवास थांबला. त्याद्वारे प्रवासी वाहतुकीतून मिळणार्या चार लाख 83 हजार रुपयांचा तोटा एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला सहन करावा लागला. जिल्ह्यातील बहुतांशआगारांना याचा फटका बसला. प्रवाशांचे हाल तर झालेच, पण एस.टी.ला त्याचा आर्थिक बोजा सहन करावा लागला.
कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे थांबलेल्या बसेस आषाढी वाढीकरिता पंढरपूरकडे जादा म्हणून सोडल्या गेल्या. बुधवारी 40, गुरुवारी 76 आणि शुक्रवारी तब्बल 170 जादा बसेस पंढरपूरला भाविकांच्या वाहतुकीसाठी रवाना झाल्या. या बसेसमार्फत साधारणपणे हजारभर फेर्या होतील आणि त्याद्वारे पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा एस.टी.च्या कोल्हापूर विभागाचा अंदाज आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एकादशीच्या अगोदर आठवडाभर जादा गाड्या सोडून त्याचा उपयोग होत नाही, असा प्रशासनाचा अनुभव आहे. म्हणूनच शुक्रवारी (दि.15) आषाढी एकादशी असल्याने बुधवारपासून (दि.13) पंढरपूरकडे जादा गाड्या सोडल्या गेल्या. पंढरपूरला जाण्यापेक्षा परतीच्या प्रवासासाठी भाविकांकडून एस.टी.चा उपयोग अधिक केला जातो. त्यानुसार कोल्हापूर विभागातील सर्वच आगारांनी नियोजन करून जादा गाड्या सोडल्या.