तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केल्याने संघर्ष निर्माण झाला असून, भारतीय नागरिकांनी तुर्कस्तानला जाण्याचे टाळावे. तसेच तुर्कस्तानमधील भारतीय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे.
सुषमा स्वराज यांनी आज (शनिवार) ट्विटरवरून नागरिकांना हे आवाहन केले आहे. तुर्कस्तानच्या लष्कराने केलेल्या या कारवाईनंतर भारतीय परराष्ट्र खाते सतर्क झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय राजदूतात राहणाऱ्या भारतीयांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अंकारामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी +905303142203 आणि इस्तंबूलमधील नागरिकांसाठी +905305671095 हे हेल्पलाईन नंबर सुरु केले आहेत.
तुर्कस्तानमध्ये लष्कराने सत्ता हाती घेत केलेल्या उठावामुळे निर्माण झालेल्या संघर्षात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 17 पोलिसांचा समावेश आहे. इस्तंबूल विमानतळाला लष्कारने घेराव घातल्याचे वृत्त आहे. तर, पंतप्रधान बिनाल यिल्दीरीम यांनी आपण नागरिकांसोबत असल्याचे म्हटले आहे.