आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे यासाठी आज गुरुवारपासून 24 तास दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली.
आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही यात्रांच्या काळात नित्यपूजेच्या शिवाय इतर राजोपचार बंद असतात. देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. आता पुढील काही दिवस पहाटे साडेतीन ते चार वाजेपर्यंत नित्यपूजा, सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजेपर्यंत महानैवेद्य व रात्री नऊ ते साडेनऊ लिंबू पाणी दाखविणे या करिताच फक्त दर्शन बंद ठेवण्यात येईल. उर्वरित बावीस तास पंचेचाळीस मिनिटे दर्शन सुरू राहणार आहे.
आषाढी यात्रेच्या गर्दीच्या काळात 12 ते 20 जुलै या दरम्यान ऑनलाइन दर्शन बंद राहणार आहे. आषाढी पौणिमेनंतर 24 किंवा 25 जुलै रोजी प्रक्षाळपूजा करून श्री विठ्ठलाचे नित्योपचार पूर्ववत सुरू केले जाणार आहेत.