कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशा हवामानातील बदलामुळे मुंबईत डोळ्यांचे विकार बळावले आहेत. खासगी व महापालिका रुग्णालयांत दररोज दहा टक्के अधिक रुग्ण डोळ्यांची समस्या घेऊन रुग्णालयांत धाव घेत आहेत.
डोळ्यांचा संसर्ग झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेण्याचा सल्ला घ्यावा. डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे आदी डोळे येण्याची लक्षणे आहेत. एका डोळ्याला संसर्ग झाल्यास लगेच दुस-या डोळ्यालाही संसर्ग होतो. या काळात योग्य काळजी न घेतल्यास आजूबाजूच्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो.
हा संसर्ग बरा होण्यासाठी आठवडाभर लागतो. डोळे आलेल्या व्यक्ती संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो, हा एक गैरसमज आहे. डोळ्याचा संसर्ग हा हवेमार्फत होतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला डोळे आले आहेत. त्याच्या वस्तू वापरल्यास संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, असे जे. जे. रुग्णालयातील नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले.
काय करावे?
स्वत:चा रुमाल वेगळा ठेवावा, हात साबणाने स्वच्छ धुवावेत, डोळे पुसण्यासाठी टिशू पेपरचा वापर करा व योग्य पद्धतीने पेपरची विल्हेवाट लावा. गॉगलचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच ड्रॉप्सचा वापर करा. सतत डोळ्याला हात लावू नका व नेत्रचिकित्सकाकडून योग्य ते उपचार करून घ्या.
हे करू नये!
डोळे चोळू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्यांत घालण्याचा ड्रॉप्स दुस-या व्यक्तीने वापरू नये. स्टिरॉईडचा वापर टाळा. डोळे पुसण्यासाठी दुस-यांचा रूमाल वापरू नये.