जिल्हाधिकारी जेव्हा शिक्षिका होतात..

अलिबाग तालुक्यातील खानाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आजचा दिवस काहीसा कुतूहल आणि आनंदाचा ठरला. जिल्हय़ाचे प्रशासन चालवणाऱ्या जिल्हाधिकारी त्यांच्या शाळेत शिक्षिका म्हणून लाभल्या. निमित्त होते ते एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाचे. कोकण आयुक्तांच्या निर्देशानुसार कोकणातील पाच जिल्हय़ात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले झाल्या आणि चौथी ते सातवीतील मुलांना अभ्यासाचे धडेही दिले. शाळेची घंटा वाजली, मुले आपापल्या वर्गात येऊन बसली. नेहमीप्रमाणे गुरुजी येतील आणि अभ्यास सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे झाले नाही गुरुजींच्या ऐवजी बाई वर्गावर आल्या. त्यांनी मुलांचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. मुले थोडी गांगरली, या नवीन शिक्षिका कोण, असा प्रश्न त्यांना पडला. नंतर नेहमीचे गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी मुलांना याबाबतचा खुलासा केला. या आपल्या जिल्हय़ाच्या जिल्हाधिकारी आहेत आणि आज या तुम्हाला अभ्यासाचे धडे देणार आहेत. एरवी अधिकाऱ्यांची शाळा घेणाऱ्या जिल्हाधिकारी आज मुलांची शाळा घेणार होत्या. ही जबाबदारी त्यांनी मोठय़ा खुबीने पार पाडली. जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेतील प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर संवाद साधला. शिक्षणापासून होणारे फायदे, स्वच्छता, आरोग्य याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना कळेल अशा साध्या व समर्पक भाषेत विशद करून सांगितली. इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलणारी नदी हा धडा शिकविला तर इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील ‘नसíगक साधनस्रोत’ या पाठातील शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासाची माहिती जाणून घेतली. तसेच इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘माय’ ही कविता तसेच गणितातील लघुकोन, काटकोन, विशालकोन याबाबतची शैक्षणिक माहिती दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यावर होणारे फायदे व शिक्षण घेतले नाही तर होणारे तोटे याबाबतही योग्य ते मौलिक मार्गदर्शन त्यांनी या वेळी केले. शिक्षण  हा जीवनाचा पाया असून मुलांनी जास्तीत जास्त शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे. इंटरनेट हे माहितीचे महाजाल असून मुलांनी ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगून शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावाही त्यांनी घेतला.   मुलांना शिकवताना शाळेतील छत गळत असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. मग काय संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून शाळेचे छत तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी लागणाऱ्या निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून उपलब्ध करून दिला जाईल, असेल असेही स्पष्ट केले. शाळेत मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते बांधण्याचे निर्देशही संबंधित विभागांना दिले. विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा स्वाद त्यांनी घेतला. मुलांसाठी बनवण्यात आलेल्या खिचडीतील भात कच्चा असल्याचे आणि त्यात मीठ कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग खिचडी योग्य प्रकारे कशी शिजेल याबाबत सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. कोकण आयुक्तांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्हय़ातील ६०० अधिकारी सहभागी झाले होते. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी स्वत: या उपक्रमासाठी खालापूर तालुक्यातील सावरोली ही शाळा निवडली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी अलिबाग तालुक्यातील सागांव शाळेत तर अपर जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी उरण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरनेर येथे जाऊन तास घेतला. – See more at: http://www.loksatta.com/maharashtra-news/district-officials-teaching-in-school-1264385/#sthash.Mm792meo.dpuf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *