शहरातील पहिली महिला रिक्षाचालक अनामिका भालेराव यांनी स्वतःच्या मालकीची रिक्षा घेतली असून आजपासून मोठ्या उत्साहात ही रिक्षा रस्त्यावर धावू लागली आहे. अबोली रंगाच्या या रिक्षेमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मोबाईल चार्जिंग, वायफाय, फस्ट एड बॉक्सपासून ते मोबाईल रिचार्ज, चहा-कॉफी एवढेच काय, पण प्रवाशांना वाचण्यासाठी वर्तमानपत्रांचीही सोय केली आहे. त्यामुळे ठाण्यात सध्या भालेराव यांची हायटेक रिक्षा हा चर्चेचा विषय बनला आहे. उपवन इथल्या अनामिका भालेराव या १३ मे २०१३ पासून ठाण्यात रिक्षा चालवतात. मात्र त्यांच्याकडे स्वतःचे परमीट नव्हते. परमीटसाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने त्यांनी बँकेचे कर्ज काढून नवी रिक्षा घेतली. परिवहन विभागाच्या निर्णयानुसार भालेराव यांची रिक्षा बनविण्यात आली आहे. आज वाहतूक शाखेच्या माजी पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या उपस्थितीत आजपासून या अनोख्या रिक्षाचा शुभारंभ केला. यावेळी भालेराव यांचे नातवाईकही उपस्थित होते. अबोली रंगामुळे महिला प्रवाशांना ही रिक्षा सोयीची ठरली आहे. सकाळी ९ ते दुपारी २ व दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भालेराव रिक्षा चालवतात. त्यांचे पती अविनाश भालेराव हेही रिक्षाच चालवित असून त्यांच्याकडून त्यांनी रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. पती-पत्नी दोघेही रिक्षाचालक असल्याचे महाराष्ट्रातील हे पहिलेच उदाहरण ठरले आहे.