शुक्रवारपासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाचा प्रभाव रविवापर्यंत कायम राहिल्याने मुंबईकरांचा वीकेण्ड आनंददायी गेला. मुसळधार सरींचा आनंद घेत चौपाटय़ांवर गरमागरम मका, चहा, वडापाववर ताव मारणा-या मंडळींची गर्दी दिसत होती. वीकेण्ड एन्जॉय करत सोमवारी प्रत्येकजण कामासाठी घराबाहेर पडताच पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री केली.
सकाळी काही वेळ बरसल्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपानंतर जोरदार बॅटिंग करण्यास सुरूवात केली. सोबत वा-यांच्या वेगामुळे संपूर्ण परिसर पावसामुळे झाकोळलेला दिसत होता. येते २४ तास शहर परिसरात ढगाळ वातावरणाच प्रभाव राहणार असून पावसाची एखाद दुसरी सर जोरदार बरसण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत केवळ रिपरिप करत बरसणा-या पावसाने गेला आठवडाभरापासून चांगलाच जोर धरला आहे. अधुनमधून विश्रांती घेत पहाटे, दुपारी, सायंकाळी, रात्री या वेळेत पाऊस बरसत असल्याने मुंबईकरांना काही वेळ पावसाच्या जोरातून सुटकाही मिळत आहे. पावसाचा प्रभाव दिवसभर कायम राहिल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.
परिणामी वाहतूक धीम्या गतीने होत होती. छत्री, रेनकोट घेत रस्त्याच्या कडेने चालणारे नागरिक पाण्याच्या डबक्यांना मात्र त्रासलेले दिसत होते. दिवसभर संततधार कायम राहिल्याने कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
कुलाबा येथे कमाल २९.५ अंश सेल्सिअस, किमान २५ अंश सेल्सिअस ६ मि.मी. पावसाची नोंद तर सांताक्रूझ येथे कमाल २९.६ अंश सेल्सिअस, किमान २४.४ अंश सेल्सिअस आणि ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
येते २४ तास कोकण-गोवा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून वा-यांचा वेग जोरदार राहणार असल्याने मच्छीमारांना किनारपट्टीवर न जाण्याचा इशारा वेधशाळेतर्फे देण्यात आला आहे.