‘माझे पती सौभाग्यवती’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

वैभव मांगले या हरहुन्नरी कलाकाराने स्त्री व्यक्तिरेखा साकारलेली ‘माझे पती सौभाग्यवती’ मालिका सर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका जुलै महिन्यात संपणार असून त्याऐवजी एक नवी मालिका तुमच्या भेटीला येईल. गेल्यावर्षी २८ सप्टेंबरला ‘माझे पती सौभाग्यवती’ ही मालिका सुरु झाली होती. या मालिकेची कथा एका स्ट्रगलर अभिनेत्याची होती. यात वैभव मांगलेने दोन व्यक्तीरेखा साकारलेल्या आहेत. एक म्हणजे वैभव आणि दुसरी व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मीची. तर वैभवच्या पत्नीची भूमिका नंदिता धुरी हिने साकारली आहे.  दरम्यान, वैभवला नक्की कोणती चिंता सतावतेय असा प्रश्न त्याच्या पत्नीला पडला असून ती त्याचा शोध घेतेय. अशी कथा सध्या मालिकेत सुरु आहे. याचा अर्थ काही दिवसातच वैभवच्या पत्नीला सर्व सत्य कळेल आणि त्याचे खरे रुपही लोकांसमोर येईल. यावर मालिकेचा शेवट होईल. ‘माझे पती सौभाग्यवती’ मालिका जरी तुमचा निरोप घेत असली तरी येत्या १८ जूलैपासून रात्री ८.३० वा. ‘खुलता कळी खुलेना’ ही नवीन मालिका तुमच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच लॉन्च करण्यात आला. या मालिकेत ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख ही नवी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. प्रोमो पाहता ही मालिका प्रेमावर आधारित असलेले याबाबत काही शंकना नाही. काही नात्यांना नाव नसतं ही या मालिकेची टॅग लाईन असून याची कथा काय असेल याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *