मराठवाड्यात पीककर्जासाठी बॅंकांतर्फे अडचणी निर्माण केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतही यावर गंभीर चर्चा झाली. त्यानुसार येत्या तीन दिवसांत प्रत्येक जिल्ह्याचे पालक सचिव त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पीककर्जाचा आढावा घेतील. कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, की मराठवाड्यासह विदर्भातील उद्योगांना वीजदरात सवलती देण्याचा निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत होईल. उत्तर महाराष्ट्राबाबतीतही सरकार विचार करीत आहे.
टॅंकरमुक्तीसाठी महाराष्ट्रातही वॉटर ग्रीड योजना राबविणार आहोत. गुजरातमधील योजना आम्ही बघून आलो. मराठवाड्यात भविष्यात वॉटर ग्रीड राबविण्यासाठी अभ्यास केला जात आहे. इतर राज्यांमधील योजनांचाही अभ्यास सुरू असून, येत्या तीन महिन्यांत अहवाल तयार केला जाईल.
नाबार्डतर्फे दोन हजार कोटी रुपये बॅंकांना दिले जाणार आहेत. संबंधित बॅंकांनी ही रक्कम गरजू शेतकऱ्यांनाच पीककर्जासाठी वाटप केली, याची लेखी हमी आम्हाला द्यावी, असे वित्त विभागाचे म्हणणे होते. बॅंकांकडून आम्ही हमी घेत आहोत. त्यासाठी एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
एकच लक्ष्य
राज्य सरकारतर्फे प्रसिद्ध केलेल्या “एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष‘ या जाहिरातीतील चुकीवरून सोशल मीडियामध्ये विविध पोस्ट फिरत आहेत. यावर “प्रत्येक चांगल्या कामाच्यावेळी विकृत बुद्धीचे लोक येतातच. आम्ही याची पूर्ण चौकशी केली आहे. विविध प्रकारच्या 50 जाहिरातींचा समावेश असलेली सीडी ही संपादित करता येण्याजोगी असल्याने असे खोडसाळ कृत्य करण्यात आले,‘ असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
तलाक कधी घेता?
संजय राऊत यांच्या विधानानंतर माधव भंडारी यांनी “तलाक कधी घेता‘, असा लेख लिहिला. यावर श्री. मुनगंटीवार यांना विचारले असता, त्यांनी सावध भूमिका घेतली. राऊत आणि भंडारी यांचे ते व्यक्तिगत मत आहे. ती मते काही उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाहीत. ती काही पक्षाची भूमिका होऊ शकत नाही. तसेच याचा संबंध सरकार चालविण्याशी जोडता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.