विविध आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका मंत्र्याचा भुखंड घोटाळा समोर आला आहे. भुसावळ जिल्ह्य़ातील मानपूर येथील जमीन खरेदीवरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनी कारखाना काढण्याच्या नावाखाली पाच एकर जमीन लाटल्याचा आरोप होत आहे.
‘तापीपूर्णा साखर कारखाना’ काढण्याच्या नावाखाली २००२ मध्ये गिरीश महाजन यांनी जमीन खरेदी केली होती. गिरीश महाजन यांनी वैयक्तिक नावावर पाच एकर जमीन फक्त १ लाख ११ हजार रुपयांमध्ये विकत घेतली. या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरी देऊ असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विशेष म्हणजे एकनाथ खडसे हेच या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक होते. मात्र, या साखर कारखान्याची नोंदणीही झाली नाही आणि तो कधीच अस्तित्वातही आला नाही.