अशिक्षित मुलांचे प्रमाण वाढतेय!

अशिक्षित मुलांचे प्रमाण वाढतेय!

लहान मुलांच्या मनात शिक्षणाबाबत गोडी निर्माण व्हावी, याकरिता केंद्र व राज्य सरकारद्वारे शहरी व ग्रामीण भागात राबवण्यात येणा-या ‘साक्षरता अभियानां’तर्गत शिक्षणाचा प्रसार करण्यात येत आहे. मात्र, तरीही देशात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. दारिद्रय़रेषेखालील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा अस्तित्वात असूनही देशात लहान मुलांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात पोटापाण्यासाठी लहान वयात कामाला जुंपणा-या बालकामगारात ७ ते १४ वयोगटांतील १० लाख ४० हजार लहान मुलांना स्वत:चे नावही लिहिता येत नसल्याची धक्कादायक बाब ‘चाईल्ड राईट्स अँड यू’ (क्राय) या संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

‘क्राय’च्या सर्वेक्षणानुसार, देशभरात दर तीन बालकामगारांपैकी एक जण निरक्षर आहे. महाराष्ट्राची स्थितीही फार चांगली नाही. १ लाख ३० हजार १९२ बालकामगारांपैकी २६ टक्के कामगार अशिक्षित आहेत. ५ ते १४ वर्षे वयोगटांतील ३० टक्के मुले शिक्षणाबरोबर तडजोड करतात. भारतातील बालकामगारांचे प्रमाण असलेले महाराष्ट्र हे चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सात लाख २७ हजार ९३२ बालकामगार आहेत. त्यातील एक तृतियांश बालकामगार ठाणे, नाशिक, पुणे, मुंबई उपनगरे व जळगाव जिल्ह्यातील आहेत. यात ठाण्यात सर्वाधिक बालकामगार असल्याचे ‘क्राय’चे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *