डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज रात्री हिंदू जनजागृती समितीच्या वीरेंद्र तावडे याला अटक केली. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सुमारे अडीच वर्षांनी करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र तावडे याला रात्री साडेआठच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला उद्या पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.
“सीबीआय‘च्या अधिकाऱ्यांनी एक जून रोजी सकाळी पुण्यातील शनिवार पेठेतील “सनातन‘चे साधक सारंग दिलीप अकोलकर आणि पनवेलमध्ये वीरेंद्र तावडे या दोघांच्या घरांची झडती घेतली. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल क्रमांक आणि ई-मेलची तपासणी केली होती. तावडे हा दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित होता. सीबीआयसह राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारी त्याच्या मागावर होते.
सारंग अकोलकर आणि तावडे यांच्यात ई-मेलवरून संपर्क होता. पनवेलमध्ये सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचे घर आहे. गेल्या आठवड्यातील छाप्यानंतर तावडेला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. तो आज चौकशीसाठी हजर झाला होता. त्यानंतर रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे समजते. वीरेंद्र तावडे सात- आठ वर्षे साताऱ्यात होता. गणपतीदान मोहिमेला त्याने विरोध केला होता. मडगाव बॉंबस्फोट प्रकरणातील संशयितांशी त्याचा संपर्क असल्याचा सीबीआयचा संशय आहे.
दाभोलकर यांची पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ पुलावर दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास हल्ला करून मारेकरी दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेसह इतर यंत्रणांनी केला. परंतु, त्यांना अपयश आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयनेही संशयितांची रेखाचित्रे जारी केली. परंतु, मारेकऱ्यांना पकडण्यात यश आले नव्हते.
वीरेंद्र तावडेला अटक करून सीबीआयने मोठे पाऊल उचलले आहे. तावडे मुख्य सूत्रधार आहे की अन्य कोणी, हे निश्चित नाही; परंतु या कटात त्याची मुख्य भूमिका असावी याबाबचे पुरावे मिळाले असावेत म्हणून त्याला अटक झाली.