जागतिक शांततेसाठी दिल्लीत ‘बासरी महोत्सव’

प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह देशभरातील ४० आणि जगभरातील अनेक नामवंत बासरीवादक येथील सातव्या वार्षिक रसरंग जागतिक बासरी महोत्सवात सहभागी होत असून, त्यातून जागतिक शांततेचा संदेश दिला जाणार आहे.

२१ सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिनी या पाच दिवसांच्या महोत्सवाला प्रारंभ होईल. संयुक्त राष्ट्राकडून १२ दिवसांची जागतिक शांतता मोहीम राबविली जाणार असून, तिचा प्रारंभही दिल्लीतून होईल. साध्या बांबूपासून तयार केलेल्या या वाद्यामुळे श्वासातून संगीत फुलते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने आपल्या ध्येयसिद्धीसाठी या वाद्याची निवड केली आहे.

भारतात अनेक प्रदेशांमध्ये सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या बासरीचा संगीतासाठी वापर केला जात असून, जागतिक स्तरावरही ती उपयोगात आणली जाते. बासरीतून बाहेर पडणारे मधुर स्वर देशाला बांधून ठेवतात.

बासरी मानवी, अध्यात्मिक आणि दैवी घटकांना जोडते. सुंदर स्वरांचा हा मार्ग एकमेवाद्वितीय असतो, असे संयुक्त राष्ट्राच्या भारत आणि भूतान माहिती केंद्राचे प्रमुख राजीव चंद्रन यांनी म्हटले आहे.

या वर्षी इटली, स्लोव्हाक, लॅटिव्हा आणि अफगाणिस्तानातील २७ बासरीवादक सहभागी होतील. पंडित चौरसिया यांच्याकडे या महोत्सवाचे पालकत्व आहे. पंडित प्रवीण गोधकिंडी, पंडित रोनू मजुमदार, पं. चेतन जोशी हे आपल्या बासरीवादनाने रसिकांना मोहिनी घालतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *