दहावीचा निकाल-यंदाही मुलींचीच बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. राज्यात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून त्याचा निकाल ९६.५६ टक्के लागला आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा यंदा दहावीचा निकाल १.९० टक्क्यांनी घटला असून तो ८९.५६ टक्के लागला आहे. तर राज्यात दहावी परीक्षेत यंदा मुलींनी बाजी मारली आहे.

सर्वात कमी निकाल लातूर जिल्ह्याचा ८१.५४ टक्के लागला. दुस-या स्थानावर कोल्हापूर विभागाने बाजी मारली असून त्यांचा निकाल ९३.८९ टक्के लागला आहे. त्या खालोखाल पुणे विभागाचा ९३.३० आणि चौथ्या स्थानावर मुंबई विभागाचा ९१.९० टक्के निकाल लागला. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत मुंबई विभागाचा निकाल १ टक्क्याने घटला आहे.

राज्यात गेल्या काही वर्षापासून दहावी आणि बारावीच्या निकालांवर मुलींचे वर्चस्व आहे. यंदाही ही परंपरा कायम आहे. यंदा मुलांच्या तुलनेत ९१.४१ टक्के मुली दहावीत यशस्वी ठरल्या असून ८७.९८ टक्के मुलांनी या परीक्षेत यश मिळवले आहे.

या परीक्षेला कोकण विभागातून दहावीच्या परीक्षेला ४०८५१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३९ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ९६.५६ टक्के आहे. तर मुंबई विभागातून ३ लाख २३ हजार ९५५ विद्यार्थी बसले होते.

नारायण राणे यांनी केले दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरल्याचा आनंद आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

विभागीय मंडळ निहाय निकाल 

कोकण – ९६.५६ टक्के

कोल्हापूर – ९३.८९ टक्के

पुणे – ९३.३० टक्के

मुंबई ९१.९०  टक्के

नाशिक – ८९.६१ टक्के

औरंगाबाद ८८.०५ टक्के

नागपुर- ८५.३४ टक्के

अमरावती – ८४.९९ टक्के

लातूर – ८१.५४ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *