चांगला पाऊस झाला तरीही ‘अच्छे दिन’ दूरच

चांगल्या पावसावर सरकारच्या आशा असल्या तरीही यंदा चांगला पाऊस झाला तरीही येत्या तीन महिन्यांत महागाईचा भडका उडेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. डाळी, साखर, भाज्या आणि अंडी यांच्या किमतीत कमी पुरवठय़ामुळे प्रचंड वाढ होणार असून त्यामुळे महागाईच्या आगीत तेल ओतले जाणार आहे. परिणामी रिझर्व्ह बँक व्याज दरात कपात करण्याची आशा मावळल्यात जमा आहे.

एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ६.३२ टक्के झाला जो मार्चमध्ये ५.२१ टक्के होता. भारतात खाद्यपदार्थाच्या किमती अत्यंत संवेदनशील विषय आहे, कारण एक चतुर्थाशाहून अधिक लोकसंख्या ७४ रुपयांपेक्षा कमी किमतीत उपजीविका करतात. सलग दोन वर्षे भारतात दुष्काळ पडल्यानंतर पिकाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आता चांगल्या पावसाची अपेक्षा सर्वानाच आहे. हवामान खात्याचा अंदाजही तसाच आहे. भारतात जूनपासून पेरणीला सुरुवात होते आणि ऑक्टोबरमध्ये कापणी केली जाते.

इंड्रिटेड डेरिव्हेटिव्हज आणि कमोडिटीजचे प्रमुख हरीश गलीपेल्ली यांच्या मते चांगल्या पावसाने पीक उत्पादन वाढेल; परंतु नवीन पीक काही महिन्यांनंतरच उपलब्ध होईल. नवीन पीक येईपर्यंत किमती आजसारख्या कडाडलेल्याच राहतील. भारतात सर्वाधिक वापरल्या जाणा-या चना डाळीच्या किमतीत वर्षभरात तिपटीने वाढ झाली तर साखरेच्या किमतीत ३५ टक्के वाढ झाली आहे. बटाटय़ाचे भाव दुप्पट झाले आहेत.

रमझानसारख्या सणासुदीच्या दिवसात मागणी वाढेल; परंतु आवक कमी असल्यामुळे या पदार्थाच्या किमती आणखी वाढतील, असा अंदाज फिलिप कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक अश्विनी बनसोड यांनी व्यक्त केला. वाढत्या किमती रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासाठी व्याजदरात कपात करणे मुश्कील करतील. उद्दिष्टानुसार महागाईच्या दरात घट झाल्याने राजन यांनी रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे.

भाज्यांच्या किमती भडकलेल्या असल्या तरीही अतिउष्ण तापमान आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी भाजीपाला लागवड करू शकत नाही, हाही मुद्दा संकटात भर घालणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *