क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच वादात राहणारा माजी क्रिकेटर एस श्रीशांतने केरळ विधानसभा निवडणुकीतून नव्या इनिंगला सुरुवात केली खरी, मात्र या इनिंगमधील श्रीशांतचा पहिलाच बॉल ‘नो बॉल’ ठरला.
एस श्रीशांत हा तिरुअनंतपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढत होता. राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते व्ही एस शिवकुमार यांनी श्रीशांतचा 11710 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात श्रीशांत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. श्रीशांतला 34764 मतं मिळाली. विजयी उमेदवार शीवकुमार यांना 46,474, मतं तर दुसऱ्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट अँथोनी राजू यांना 35,569 मतं मिळाली.
श्रीशांत मूळचा केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याचा आहे. त्याची राजकारणातील पदापर्णाची चर्चा अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने ट्विटरवर फोटो पोस्ट केले होते. मात्र लोकांनी त्याची थट्टाच केली.
दरम्यान, माझा पराभव झाला असला तरी मी राजकारणातील कारकीर्द सुरुच ठेवणार, अशी प्रतिक्रिया श्रीशांतने ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.
क्रिकेट कारकीर्दीमध्ये श्रीशांतची चर्चा नेहमीच चुकीच्या कारणांमुळेच व्हायची. आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी 2013 मध्ये श्रीशांतला अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीनही मिळाला. मात्र बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली.
तर 2008 मध्ये आयपीएलच्या एका सामन्यात हरभजन सिंहने थोबाडीत मारल्याचा आरोप करत श्रीशांत कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला होता. त्यानंतर “माझ्या मनात हरभजन सिंहविषयी कोणताही राग नाही, तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे,” असं स्पष्टीकरणही श्रीशांतने दिलं होतं.