हवेच्या प्रदूषणामुळे श्वासाद्वारे शरीरामध्ये जाणाऱ्या प्रदूषित घटकांमुळे मानवी आयुर्मानात साधारण 3.4 वर्षांची घट होत असल्याचे भारतीय उष्पप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
हवेच्या प्रदूषणाचा भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत दिल्लीमध्ये मानवी आयुर्मानावर सर्वाधिक परिणाम होत असून तेथील आयुर्मान 6.3 वर्षांनी कमी होत आहे. “गेल्या दोन दशकांपासून उद्योगांमध्ये, तसेच शहरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतुकीतून उत्सर्जित होणाऱ्या हवेमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे‘, अशी माहिती आयआयटीएमचे अधिकारी सचिन घुडे यांनी दिली. जमिनीवरील ओझोन श्वासाद्वारे शरीरात गेल्याने उद्भवणाऱ्या फुफ्फुसांच्या गंभीर आजारामुळे दरवर्षी 31 हजार भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. दिल्लीनंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागत असून तेथील मानवी आयुर्मान 6.1 वर्षांनी कमी झाले आहे. तर त्यानंतर बिहारचा क्रमांक लागत असून तेथील आयुर्मान 5.7 वर्षांनी कमी झाले आहे.