भारताकडून रिओ ऑलिंपिकसाठी मोठी तुकडी जाणार

5 ऑगस्ट रोजी सुरू होणा-या रिओ ऑलिंपिकसाठी भारतातून जवळपास 90 खेळाडू जाणार असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. भारतातून 90 मुष्टियोद्धांची रिओ ऑलिंपिकसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळेच भारत यंदा रिओ ऑलिंपिकसाठी सर्वात मोठी तुकडी पाठवणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
रिओ ऑलिंपिकसाठी 58 खेळाडूंची व्यक्तिगतरीत्या निवड झाली आहे. त्यातील 32 खेळाडू हे हॉकीपटू असून, ते रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार असल्याचीही माहिती यावेळी किरण रिजीजूंनी दिली. या खेळाडूंना त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी देशात आणि देशाबाहेरही विशेष सहाय्य केलं जाणार आहे.
1980ला मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी फुटबॉलपटू प्रशून बॅनर्जींच्या मते खेळाडूंमध्ये कौशल्याचा अभाव नाही. मात्र त्यांना योग्य मदत मिळत नसून, ते मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात. त्याला उत्तर देताना केंद्र सरकार खेळाडूंच्या भल्यासाठी सदोदित सूचना ऐकायला तयार असल्याचं सूचक वक्तव्य किरण रिजीजूंनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *